‘महिलांना एक खून माफ करण्याबाबत’ रोहिणी खडसेंचे राष्ट्रपतींना पत्र!

आज जागतिक महिला दिन सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्य सरकारने विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

रोहिणी खडसे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून एक खून माफ करण्याबाबत मागणी केलीय. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिले आहे की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे… आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल?

नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.

आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे.आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असे पत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खड़से खेवलकर यांनी लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here