गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेतील हप्ता १५०० वरून २१०० केला जाईल, असं महायुतीनं नमूद केलं होतं. मात्र, अद्याप तो निधी वाढवला नसल्यानं सरकारवर आरोप होत आहेत. यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी विधानसभेत निवेदन केलं आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आदिती तटकरेंनी यावेळी उत्तर दिलं. “लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आलं होतं की १५०० हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून मिळत असेल, तर त्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही”.
नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान १५०० रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा. त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून १००० रुपये तर वरचे ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात. त्यामुळे त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं नाही. २० ते २५ लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत”, असं आदिती तटकरेंनी यावेळी बोलल्या.