दिशा सालियन प्रकरणाच्या पुनर्चौकशीसाठी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आता या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीशी जरी लाज असती तर ते देश सोडून गेले असते’, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी केली. पोलिसांना हाताशी धरून उध्दव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले आहेत का याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचे नारायण राणे सुरुवातीपासूनच बोलत होते. पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत. ज्या मुलींच्या संरक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली, त्यांचा मुलगा आणि नातवावर असे आरोप होत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी पुन्हा याचिका दाखल केल्याने आदित्य ठाकरेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.