शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता ठाकरे यांच्या या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अधिवेशनातील कामकाजाला निरर्थक कामकाज झालं असं ते म्हणाले. याचं मला नवलं वाटलं. आहो पण तुम्ही जर अधिवेशनात भाग घेतला तर तुम्हाला कामकाजाचा अर्थ समजेल. पाहुण्यासारखं यायचं आणि निघून जायचं असं जे करतात त्यांना अर्थ काय कळणार? त्यासाठी पूर्णवेळ सभा गृहात बसावं लागतं. लोकांचे प्रश्न मांडावे लागतात असा टोला यावेळी शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की तुम्ही रेकॉर्ड काढून बघा दोघे अधिवेशनात किती वेळा आले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं असतं. यामध्ये ठाकरे पिता पुत्रांनी भाग घेतला नाही, ते फक्त माध्यमांकडे जाऊन टीका करत आहेत. त्यांनी अधिवेशनात भाग घेतला असता तर त्यांना अर्थ कळाला असता. त्यांनी नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.