सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह १४ देशांच्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उमरा, व्यवसाय आणि कुटुंब व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध जूनपर्यंत कायम राहणार असून ज्यांच्याकडे उमरा व्हिसा आहे ते १३ एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकणार आहेत. या वर्षीच्या हज यात्रेच्या आधी सौदी अरेबियाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
सौदी अरेबियामधील अधिकाऱ्यांनी या निर्णयासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, हज यात्रेशी संबंधित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि योग्य नोंदणी केल्याशिवाय देशात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना रोखण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी हज यात्रेत उष्णतेमुळे अनेकांच्या मृत्यूची घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.