महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे वादंग निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाला जाहीर विरोध केला असून, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही आव्हान दिलं आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर प्रतिक्रिया दिली असून, इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे अशी विचारणा केली आहे.
“महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे, सर्वांनी ती शिकलीच पाहिजे. पण त्याच्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येतो. मला तर आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठीला कोणी विरोध केला तर सहन करणार नाही हेदेखील स्पष्ट केलं.