मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रो आता थेट शहरातील महत्त्वाच्या टर्मिनसला जोडण्यात येणार आहे.‘मेट्रो 8’ आता लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणार आहे.मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 मार्गिकेचा आराखडा अखेर पूर्ण झाला आहे. लवकरच सिडकोकडून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळ-नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8’ मार्गिकेचा आराखडा अखेर सिकडोने तयार केला असून हा आराखडा लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सिडकोने मूळ आराखड्यात काहीसा बदल करून ही मार्गिका आता दोन विमानतळांबरोबरच मुंबईतील महत्त्वाच्या अशा लोकमान्य टिळक टर्मिनसशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच आराखड्यात लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो स्थानक समाविष्ट करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी मोठ्या संख्येने गाड्या सुटत नाहीत. टर्मिनस मेट्रोने जोडल्यास भविष्यात येथून महाराष्ट्राच्या इतर भागासाठी सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.