काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यंटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर आता भारत सरकारने पाकिस्तानसंदर्भात पाच महत्त्वाचे निर्णय घेतल्यानंतर आज नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. मात्र आता या बैठकीवरुन एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आयोजि केलेल्या या सर्वपक्षीय बैठकीत फक्त पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिल्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात ओवैसींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्याकरता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यासंदर्भात मी किरेन रिजिजू यांना काल रात्री संपर्क साधला. ते म्हणाले की 5 ते 10 खासदार असलेल्या पक्षांनाच या बैठकीचं आमंत्रण देण्यात येणार आहे. कमी सदस्य असलेल्या पक्षांना आमंत्रण का नाही? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की यामुळे बैठक लांबली जाईल. मग मी म्हणालो की आमच्यासारख्या लहान पक्षांचं काय मग?” असं लिहिलेलं आहे.