मुंबईकरांचा नवी मुंबई पर्यंतचा प्रवास सुखकर आणि लवकर होणार

मुंबईतून नवी मुंबई या दोन्ही शहरांतील अंतर आता कमी होणार आहे. या मार्गावरील ६ पदरी पूल सुरु झालाय. यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या दोन नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे जाणाऱ्या ठाणे पूल क्रमांक ३ चे काम पूर्ण झालंय. या पुलाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या पुलाच्या वापरामुळे वाशी ते मानखुर्द दरम्यानचा प्रवास अधिक गतीमान आणि सुरळीत होणार आहे. उद्घाटनानंतर लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने २ समांतर पुलांची संकल्पना राबवली. यातील पहिला मानखुर्दहून वाशीकडे जाणारा पूल ऑक्टोबर २०२४ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. तर दुसरा वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा पूल आता वापरासाठी खुला होणार आहे.

या पूलाची एकूण लांबी १८३७ मीटर आहे. मुंबईकडील पोहोच मार्ग 380 मीटर आहे. मार्गिका (लेन्स) प्रत्येकी ३ लेन्सचे २ पूल अशा ६ मार्गिका आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ५५९ कोटी रुपये खर्च आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here