हनिमून आणि मृत्यू! या हत्येमागचं गूढ काय?

मेघालयामध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील जोडप्यासाठी ३ हजार पावलांचा ट्रेक मृत्यूचा सापळा ठरला आहे. पावसाळ्यातील हिरव्यागार वाटांमधून स्वप्नवत प्रवास म्हणून सुरू झालेली हा ट्रेकदरम्यानच राजा आणि सोनम रघुवंशी या नवविवाहित जोडप्याचा अंत झाला. हे दोघेही भाड्याने घेतलेली स्कूटर, उधार घेतलेले वॉटरप्रूफ स्मार्टवॉच घेऊन उत्साहात प्रवासासाठी निघाले होते. मात्र नोंगरियाटमधील प्रसिद्ध लिव्हींग रूट ब्रिजपर्यंतच्या ट्रेकनंतर त्यांचा प्रवास अचानक संपला. २२ मे रोजी हे जोडपे मावलाखियाट गावात पोहोचले आणि नोंगरियाटला उतरण्यास सुरुवात केली. त्यांनी धुक्याने आणि जंगलातील शांततेने वेढलेल्या होमस्टेमध्ये रात्र घालवली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोघेही बाहेर पडताना कोणालाही दिसले नाहीत.

दोन दिवसांनंतर, शिलाँग-सोहरा रस्त्यावरील एका कॅफेजवळ त्यांची स्कूटर सोडून दिल्यासारखी आढळली. त्यानंतर काही दिवस शांततेत गेले. मात्र अचानक काही दिवसांनी राजाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ‘वेइसावॉन्डोंग फॉल्स’जवळील दरीत सापडला. जवळच्या माव्कमा गावात थ्री एक्सएल आकाराचा एक रेनकोटही सापडला असून हा रेनकोट कदाचित या जोडप्याचा असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. “हे हत्येचं प्रकरण आहे यात काही शंका नाही,” असं पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सायम म्हणाले आहेत. “आम्हाला एक दाओ सापडला आहे. तो अगदी नवा आहे. तो याच उद्देशाने वापरला जात होता,” असं म्हणत एसपी सायम यांनी राजाची हत्या झाल्याची शंका उपस्थित केली आहे. दाओ हे मेघालयमधील शेतकरी वापरतात ते स्थानिक हत्यार आहे. हे हत्यार मोठ्या आकाराच्या चाकूसारखं असतं.

राजाच्या हातावर असलेल्या टॅटूवरून आणि त्याच्या भावाकडून घेतलेल्या वॉटरप्रूफ स्मार्टवॉचवरून मृतदेहाची ओळख पटली. त्याचे पाकीट, सोन्याचे दागिने आणि चार मोबाईल फोन मृतदेहजवळ सापडलेले नाहीत. या हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. “हत्येमागील हेतू दरोडा होता, सूड होता की इतर वैयक्तिक शत्रुत्व होतं याबद्दलचा कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आपल्याला अधिक पुरावे शोधण्याची आवश्यकता आहे,” असं एसपी सायम यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here