कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी? अजित पवारांनी दिली माहिती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील वाढत्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात माहिती दिली आहे. करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीमध्ये नेमकं काय झालं याची माहिती देतानाच अजित पवारांनी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दलची माहितीही दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी करोनाचे 102 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील करोना रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झाली आहे. राज्यामध्ये शुक्रवारी करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कोणत्या नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती सांगितली आहे.

अजित पवारांनी, “राज्याचा आढावा दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिला जातो आणि आढावा घेतला जातो. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सतत यावर लक्ष ठेऊन आहेत. विविध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाई याबद्दलची बैठक घेतली होती. जिल्हा परिषदांनी काय केलं पाहिजे, सिव्हील सर्जनने काय केलं पाहिजे. डीएचओ असतील आपल्या दोन्ही महानगर पालिका असतील, महापालिकेचे आरोग्य विभाग असतील या सर्वांबद्दल आम्ही विभागीय आयुक्तांबरोबरच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चर्चेदरम्यान त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना घाबरुन जाण्याचं कारण नाही पण ज्यांची वयं जास्त आहेत, वयस्कर लोक आहेत त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे. खोकला किंवा शिंक आल्यास नॅपकिन वापरण्याची गरज आहे. ही अशी काही काळजी घेतली गेली पाहिजे, यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत,” अशीही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here