राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, खासदार संजय राऊत यांनी या भेटीबद्दल आपल्याकडे इत्यंभूत माहिती असल्याचा दावा केला आहे. रोखठोकमधून त्यांनी यावर भाष्य केलं असून, फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते अशी टीका केली आहे.
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे हे गुरुवारी सकाळी वांद्र्याच्या ‘ताज’ हॉटेलात भेटले. दोघांत मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फीच असावी,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत. फडणवीस काळात मुंबईच्या सर्व जमिनी अदानी यांना दिल्या. मुंबईला भिकारी करून सर्व माल गुजरातला नेण्याचा हा डाव आहे काय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस भेटीत विचारला असावा अशी आशा आहे. मोदी व शहा यांना हवे तेच फडणवीस करणार व अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात. फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.