शाळेत तिसरी भाषा हिंदीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुनच आता राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंनी हा निर्णय कसा आणि का घेण्यात आला याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे.
दादा भुसेंनी अध्यादेशासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना पत्रकारांशी संवाद साधला. “जो आता नवीन शासन निर्णय आला आहे त्यात अनिवार्य हा शब्द नाही. सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे. इंग्रजी मध्यम किंवा इतर मध्यमाच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे,” असं दादा भुसे म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “इयत्ता पाचवीपासून गेल्या काही वर्षापासून हिंदी हा विषय आहे. इतर काही माध्यमांच्या शाळेत त्यांची भाषा आणि इंग्रजी तिसरी भाषा आहे. अनेक शाळेत अनेक वर्षापासून असेच शिकवले जात आहे,” असंही भुसेंनी सांगितलं. आता “इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आला आहे,” असं शालेय शिक्षणमंत्री म्हणाले.