माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भाषणामधील एका विधानावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. २१ जून रोजी ११ व्या अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना अमृता यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना थेट उद्धव यांचा उल्लेख न करता अमृता यांनी उत्तर दिलं.
उद्धव यांनी केलेल्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘कम ऑन किल मी!’ या विधानावरुन अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांनी शांततेचं महत्त्व सांगत भारत शांतताप्रिय देश असल्याचं म्हटलं. “अंतरराष्ट्रीय योग दिन आहे. योग काय सांगतं? योग हे शांतीचं प्रतिक आहे. प्रत्येक माणूस किंवा संस्था असित्त्वात असते. आपल्याला असा विचार करायची गरज नाही की आपल्याला कोणी मारेल किंवा ठार करेल. हा शांतीप्रिय देश आहे. शांतीपूर्ण पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. सर्वजण लोकांच्या भल्यासाठी सहकार्याने राहतील,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. सर्व राजकीय पक्षांमध्येही तितकिशी कटूता नाही. त्यामुळे एवढा विचार करू नये, असा सल्लाही अमृता यांनी उद्धव ठाकरेंना दिला.