राज्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगली आहे. राज ठाकरेंच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांना प्रतिसाद दिला असल्याने राज्याच्या राजकारणात नवी नांदी होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. या युतीवर राज्यातील सर्व राजकीय नेते व्यक्त होत असताना आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे रस्त्यांच्या कामाच्या पाहणीसाठी वरळीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्यातील युतीसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो की, दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे तुमच्या माध्यमातून बोलून झालं आहे. त्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून काही बोलणार नाही”.
दरम्यान राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे – राज ठाकरे युतीबाबत आता चर्चा नको अशी सूचना केली आहे. युतीबाबत माध्यमांशी न बोलण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 29 एप्रिल रोजी राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर या विषयावर बोलण्याची शक्यता आहे.