सासरच्या मानसिक आणि शारिरीक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. त्या प्रकरणात राजकीय दबाव असल्याच्या चर्चा होत्या, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे राजेंद्र हगवणेसोबत जवळचे संबंध असल्याने त्यांना पाठिशी घातल्याच्या चर्चा होत्या, त्यावरती आज अजित पवारांनी बारामतीत स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता.मी शक्य असेल तर येण्याचा प्रयत्न करतो. मी एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केलं, तर त्याला अजित पवार काय संबंध आहे. अजित पवारांनी सांगितलं का असं कर म्हणून. मी घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला आणि म्हटलं कोणी का असेना कारवाई करा. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद आतमध्ये आहे. सगळे अटकेत आहेत. सासरा पळून गेला. तो पण सापडेल, पळून पळून जातो कुठं? यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? प्रेमापोटी लोक बोलावतात तिथं जावं लागतं, नाही गेलं तर माणसं रूसतात, लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सूनेशी असं वागा म्हणून, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. जर अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकावा. माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा. उगाच बदनामी केली जाते. मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले. स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात असंही विचारलं होतं. मग माझी का बदनामी करता. गुन्हा नोंद झाला आहे. सीपींना सांगितले कारवाई झाली पाहीजे. माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून जबाबदारी म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही केलं आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.