संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा संबंध जोडला जातोय. आता या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातही धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. आवादा कंपनीला धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयातून आणि सातपुडा बंगल्यावरून (मंत्री असतानाचा धनंजय मुंडे यांचा बंगला) धमकी देण्यात आली होती, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, आवादा कंपनीकडून सातत्याने खंडणी मागितली जात होती. मे महिन्यापासून खंडणीसाठी पाठपुरावा केला जात होता. त्याच दरम्यान, २८ मे रोजी कंपनीतील कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयात बोलावून खंडणी मागितली. पाठोपाठ सातपुडा बंगल्यावर बोलावून खंडणीसाठी धमकावण्यात आलं. सातपुडा बंगल्यावर बोलावण्यामागचा हेतू स्पष्ट होता की त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्याला दाखवायचं होतं की आम्ही मंत्र्याच्या बंगल्यावर बोलावून तुला धमकावू शकतो. याचा अर्थ तुला पैसे द्यावेच लागतील. त्यामुळे यामागे धनंजय मुंडे होते की नव्हते ते देखील स्पष्ट आहे. एकदा नव्हे तर सहा वेळा अशा प्रकारे खंडणी मागण्यात आली. त्यामुळे मला वाटतं की आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावं.