शहरातील अंतर्गत वाहतूकीवर सध्या मोठा प्रमाणात परिणाम होत आहे. रस्त्यांचे सुरु असलेले काम आणि बसचे मार्ग यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यातच शहर आणि उपनगरांत सध्या सुरु असलेल्या विविध कामांचा बेस्टच्या वाहतूकीचा चांगलाच फटका बसला आहे. शहरात सुमारे 35 टक्के रस्त्यांचे एकाच वेळी काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. तसेच मेट्रो, पुलांची पुर्नबांधणी, नाल्यांवरील पुलांची बांधणी अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांमुळे बेस्टच्या 23 डेपोतून सुटणाऱ्या सुमारे 97 बस मार्गावरील जवळपास 189 बस वळवल्या आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील प्रवाशांची गैरसोय होत असून बेस्टच्या, महसुलावरही परिणाम होत आहे.
बेस्ट बस ही मुंबईकरांची ‘सेकण्ड लाईफलाईन’ आहे. किफायतशीर आणि स्वस्त तिकिट दरामुळे बसने प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्य देतात. सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ 2 हजार 800 बस आहेत. त्याद्वारे सुमारे 32 लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. बसची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने प्रवाशांना बसकरिता किमान 45 मिनिटे वाट पहावी लागत आहे. त्यातच शहरात बहुतेक सर्वच ठिकाणी विविध कामे सुरु आहेत. पालिकेने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतल्याने बेस्टला मार्ग वळवावे लागले आहेत. सुमारे ९७ बस मार्गावरील जवळपास १८९ बस वळवण्यात आल्या आहे.
मुंबई महापालिकेतर्फे संपूर्ण मुंबईतील तब्बल ३५ टक्के रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे एकाच वेळी हाती घेण्यात आली आहे. मेट्रोची कामे सुरु आहेत. यामुळे मुंबईकरांना रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे वाहन चालकांना वाहतुक कोडींचा सामना करावा लागत आहे. त्याचा फटका बेस्टला देखील बसला आहे.