शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहे. ते म्हणाले की, मला दिलेलं काम प्रामाणिकपणे करायचं हे मी नेहमी करतो, राजकारणात सर्वस्व झोकून देऊन काम केलं, तशाच पद्धतीने समाजकारणात केलं. राजकारण, समाजकारण, उत्सव, शेतीत मी रमतो, पण आता खरं सांगू का, आता असं वरच्यावर मनात येऊ लागलं की आता राजकारणातून निवृत्ती घ्याला हवी. आता सत्तरी जवळ आली या वेळी विरोधीपक्ष नेते पद मिळेल असं वाटलं होतं. पण सत्ताधारी पक्ष मला घाबरत असल्याने हे शक्य होऊ शकले नाही, अशी खंतही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.
आतापर्यंत बेधडक आणि बिनधास्त राजकारण केले. त्यामुळे राजकारणात मन रमत होतं. आता वयाची सत्तरी जवळ आली आहे. विरोधीपक्ष नेते पद पदरात पडेल असे वाटत होतं. विरोधीपक्ष नेता कसा असावा, हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं. स्वतःचा स्वार्थ काही नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत तरतूद आहे. विरोधीपक्ष नेता असा असला पाहिजे समोर सत्ताधारी कितीही बलाढ्य असला तरी त्याच्या डोळ्यात डोळे घालून जाब विचारण्याची ताकद असेल तो विरोधीपक्ष नेता असला पाहिजे. तर सरकार चांगलं चालतं आणि राज्य चांगलं चालतं , वैधानिक काम कसे करायचं हे सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचं आहे. परंतु, सत्ताधारी पक्ष मला घाबरत आहे. ते मला घाबरत असल्याचा मला आनंद होत आहे. नैराश्य येत नाही असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.