महाराष्ट्रात यंदा दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुका ऐन दिवाळीत होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पहिल्या टप्प्यात झेडपी तर दुस-या टप्प्यात मनपा निवडणुका होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या निवडणुकांसाठी तब्बल एक लाख ‘ईव्हीएम’ यंत्रांची आवश्यकता असल्याने या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यातील ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी दिलेल्या निकालात प्रलंबित निवडणुका आगामी चार महिन्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिला आहे. त्यामुळे आता पुढील तीन महिन्यांत प्रभाग रचना, आरक्षण सोडती पूर्ण करण्याला वेग येऊन निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.