मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल. दिवसेंदिवस लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कल्याण दरम्यान 15 डब्यांच्या लोकल ट्रेन सेवांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारात अडथळा निर्माण करणारी रूट रिले इंटरलॉकिंग (RRI) इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्लॅटफॉर्म विस्तार पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येकी 15 कोच असलेल्या किमान 22 अतिरिक्त लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, सध्या, सानपाडा कारशेड आणि सीएसएमटीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 7 ही एकमेव ठिकाणे आहेत जिथे 15 डब्यांची लोकल ट्रेन पार्क केली जाऊ शकते. सीएसएमटी येथील इतर प्लॅटफॉर्मची लांबी फक्त 12 कोचच्या लोकल ट्रेनसाठी योग्य आहे.
मुंबईतील वाढती गर्दी लक्षात घेता, 15 डब्यांच्या लोकल ट्रेन सेवा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते अंधेरी दरम्यान 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवणे शक्य नाही, त्यामुळे सध्या या सेवा फक्त अंधेरी ते विरार दरम्यान चालवल्या जात आहेत. प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे 15 डब्यांच्या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांचा त्वरित आढावा घेण्याची आणि त्या लवकरात लवकर अंमलात आणण्याची मागणी केली आहे.