रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच चिघळलाय. आता संभाजी ब्रिगेडने आता या वादात उडी घेतली आहे. एक मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असा इशारा संभाजी ब्रिगेड ने राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे.
सगळे समाज एकमेकासोबत आहेत. या बाबतीत वाद करणं अयोग्य आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “असं कसं तुम्ही काढून टाकणार असाही मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष आहे. तिथे गेल्या अनेक वर्षांपासून वाघ्याचा पुतळा किंवा समाधी आहे. सर्वांशी चर्चा करुन, वाद न घालता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं काही आहे का? त्यामुळे वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात. एकीकडे धनगर समाज आणि इकडे मराठा समाज वेगळा. सगळे समाज एकमेकासोबत आहेत. या बाबतीत वाद करणं अयोग्य आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.