सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निवृत्तीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवृत्तीचं वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार सेवेत घेता येईल असा निर्णय राज्यातील सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ५८ व्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अगदी वयाच्या सत्तरीपर्यंत सेवेत राहता येईल.
शासकीय तसेच निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने घेण्यावर मात्र राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय झाला नसला, तरी या नव्या निर्णयाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या निर्णयामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वयाच्या ६५ वर्षांपर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंत काम करता येणार आहे.
सरकारी आस्थापनांत अधिकाऱ्यांच्या एकूण पदांच्या १० टक्के पदांवर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांना ८० हजारांपर्यंत वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच निवृत्तीचं वय ५८ असलं तरी शरीराने साथ दिल्यास वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीला दर महिना ८० हजार रुपयांची नोकरी या माध्यमातून करता येणार आहे.