‘लाडकी बहीण योजने’सह अनेक योजनांमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती डगमगली असताना आणि त्यातच राज्य सरकार विविध निधींना कात्री लावत असतानाच अहिल्या नगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर १५० कोटी रुपये खर्च करण्याचा घाट फडणवीस सरकारने घातला आहे.जामखेड येथील अहिल्यानगर, मौजे चौंडी येथे लाईट, सीसीटीव्ही कॅमेरा, साऊंड मंडप, ग्रीन रूम प्रसाधनगृह, वातानुकूलित यंत्रणा आदी गोष्टींची चोख व्यवस्था करण्याची लगबग सुरू आहे. या कामांसाठी १५० कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागवल्या आहेत. विशेष म्हणजे मौजे चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडणार आहे.राज्याच्या हिताचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येतात. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात येते. मंत्रिमंडळाच्या बैठका मंत्रालय किंवा सह्याद्री अतिथीगृहात पार पडतात. मात्र, एप्रिलच्या अखेरपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक जामखेड येथे पार पडणार आहे. यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे.