शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केली आहे. 6 जुलैला गिरगाव ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केलाय. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई पालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी राज यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. कारण नसताना हिंदी सक्तीचा निर्णय महाराष्ट्रद्रोही सरकारने लादलाय. यासाठी सर्व पक्ष एकत्र येतायत. यांना महाराष्ट्रावर यांची हुकूमशाही लादायचीय म्हणून यांना शिवसेना संपवायची आहे. आम्ही कोणत्या भाषेच्या विरोधात नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन होईल. मी माझ्या राज्यात हिंदी सक्ती होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले तर हा विषय इथे संपेल. पण बटेंगे तो काटेंगे करुन विषाचा खडा टाकला जातोय. हिंदीला आमचा विरोध नाही. हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. हिंदी चित्रपट सृष्टीला महाराष्ट्राने जोपासलं. अनेक कलाकार मुंबईत आले आणि मोठे झाले. आम्हाला हिंदीचं वावडं नाही पण एक विधान, एक प्रधान हे सर्व एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु आहे. आता भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.