महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ५ जुलै रोजी हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईमध्ये मोर्चाची हाक दिली आहे. असं असतानाच प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्तेंनी ठाकरे बंधुंवर टीका करताना या मोर्चाला विरोध केला आहे. मात्र सदावर्तेंच्या या विधानाचा समाचार राज यांचे निकटवर्तीय आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतला आहे. सदावर्तेंचा एकेरी उल्लेख करत अविनाश जाधव यांनी, “याला मराठी माणूस जाम चोपेल. आमची भाजपाला विनंती आहे की त्याच्या तोंडावर पट्टी बसवावी,” असंही म्हटलं आहे.
“सदावर्ते हा भारतीय जनता पार्टीने पाळलेला माणूस आहे. या आगोदर त्याने सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही अशीच उडी मारतील होती. एवढी हिंमत असेल तर तिकडे दक्षिणेत जा ना. तू स्वत:ला एवढा ज्ञानी समजो ना मग तिकडं जाऊन विरोध करुन दाखव,” असं थेट आव्हानच अविनाश जाधव यांनी सदावर्तेंना दिलं आहे.