ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचले आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हिंदी भाषा सेलचे राज्य प्रमुख पारसनाथ तिवारी यांनी ॲड. गुणरत्न सदावर्तेंची भेट घेतली. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, देशातील चळवळी विचारांवर उभ्या राहतात. देशाची भाषा हिंदी आहे. पण भाषेच्या नावावर कापाकापी करू नये, त्यांना घरात बसवा. डॉक्टर पारसनाथ तिवारी आणि इतर विद्वानांनी माझा सन्मान केला आणि यापुढे या राज्यात तिसरी भाषा शिकली जाणारच आहे. हिंदी भाषा देशाची प्रिय भाषा आहे. कोकणात हिंदी भाषिक काम करतात. उद्धव आरशात पाहा, विनय शुक्ला हिंदी भाषेतील शिक्षक आहेत. ते कुणाला शिकवतात हे त्यांनी सांगावं, असे त्यांनी म्हटले.
गुणरत्न सदावर्ते पुढे म्हणाले, देशाला तोडणाऱ्यांनी ऐका, राज्यात २ कोटी लोक हिंदी भाषिक आहेत. ७ कोटी बहुभाषिक होण्यास इच्छूक आहेत. २ कोटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसारखे आहेत. राज ठाकरे लक्ष द्या, मालदिवमध्ये हिंदी भाषा अनिवार्य आहे. राज ठाकरेंच्या विचाराला पूर्ण विराम मिळाला आहे. तिसरी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे. सरकारने शासन निर्णय पुन्हा लागू करावा. ठाकरे बंधूंच्या विरोधात पुढच्या आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे दोपहरचा सामना बंद करा, असे देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.