भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार २० जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, यावेळी सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. भारताच्या फलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून पहिल्याच इनिंगमध्ये धावसंख्या ४०० केलीआहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल यांनी शतक ठोकलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर ऋषभ पंतने सुद्धा धमाकेदार कामगिरी करून शतक पूर्ण केलं. यासह २३ वर्षांनी हेडिंग्समध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.
१८ वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार २० जून पासून यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना प्रथम यशस्वी जयस्वालने १४४ बॉलमध्ये शतक ठोकलं. या दरम्यान त्याने १६ चौकार आणि १ षटकार मारला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने देखील टीम इंडियासाठी शतकीय कामगिरी केली. त्याने १४० बॉलमध्ये १०० धावा पूर्ण केल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने सुद्धा हीच लय कायम ठेवत शतक ठोकलं. १४६ बॉलमध्ये पंतने नाबाद १०५ धावांची कामगिरी केली. दरम्यान त्यानं १० चौकार आणि ५ षटकार लगावले.