रेल्वेला पैसाही द्यायचा आणि रेल्वेने जीवही घ्यायचा…आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रिया

दिवा – मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत थेट रेल्वेच्या कामाईचा मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल केला आहे. आव्हाड यांनी मागील बऱ्याच काळापासून दिव्यातून लोकल सोडण्याची मागणी रेल्वे का मान्य करत नाहीये असा सवालच उपस्थित केला आहे.

आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन संताप व्यक्त केला आहे. “धावत्या रेल्वेगाडीतून पडून झालेले मृत्यू हे वेदनादायक आहेत. लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेतील प्रवास हा नेहमीच जीवघेणा असतो. रेल्वेचा न सुधारण्याचा अट्टाहास हा अनेकांचा जीव घेऊन जातोय,” असं आव्हाड म्हणालेत. तसेच पुढे बोलताना आव्हाड यांनी, “प्रवाशांनी अनेकवेळा मागणी केली आहे की दिवा टर्मिनेटींग लोकल ट्रेन सुरू करावी. गेल्या दशकात दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील लोकसंख्या हजार पटीने वाढली आहे. मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या हजार पटीने वाढली आहे. लोकल ट्रेनच्या फेऱ्या प्रवाशी संख्येच्या तुलनेत वाढल्यात का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे,” असं आव्हाड म्हणाले आहेत.

“भारतातील सर्वात जास्त महसूल हा मुंबई लोकलमधून मिळतो. रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा, हे ऐकायलाही योग्य वाटत नाही. रेल्वेने काहीतरी उपाययोजना कराव्यात, एवढीच सर्व प्रवाशांची मागणी आहे. दिवा टर्मिनेटींग लोकल ट्रेन हा त्यावरील एक छोटासा उपाय आहे,” असं आव्हाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here