रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएल विजयाच्या सेलिब्रेशन दरम्यान ११ चाहत्यांचा मृत्यू झाल्यानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सेलिब्रेशनपेक्षा आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं असून, भविष्यात प्रत्येकाने योग्य काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. बुधवारी आपल्या आयपीएल विजेच्या संघाची झलक पाहण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमबाहेर आरसीबीच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. जवळपास अडीच लाख चाहते जमले होते. मात्र यावेळी मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४५ जण जखमी झाले.
“मला खूप वाईट वाटत आहे. मला वाटतं आपण एकमेकांकडून शिकलं पाहिजे. पुढच्या वेळी असं काही घडेल तेव्हा लोकांनी अधिक जागरूक राहायला हवं. लोक चुका करतात,” असं कपिल देव यांनी आर्चे ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या कॉर्पोरेट कार्यक्रमादरम्यान पीटीआयला सांगितलं.