औरंगजेबाची कबर असणाऱ्या खुलताबादचं नामांतर होणार आहे. सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे. “खुलताबादचं रत्नपूर असं नामांतर केलं जाईल”, अशी माहिती शिरसाट यांनी दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरचं पूर्वी खडकी असं नाव होतं. कालांतराने त्याचं नाव औरंगाबाद असं झालं. त्याचप्रमाणे खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूर होतं. कालांतराने ते खुलताबाद झालं. औरंगजेबाने जे जे कारनामे केले त्यात शहरांची नावं बदलण्याचा प्रकारही त्याने केला. त्याने अनेक शहरांची नावं बदलली. धाराशिव, नगरचाही त्यात समावेश होता. आपल्या राज्यात ज्या ज्या शहरांच्या, ठिकाणांच्या नावात बाद-बाद (उदा : दौलताबाद) असा उल्लेख आहे ती सर्व नावं बदलली जातील. आम्ही (महायुती सरकार) नावं बदलण्याची प्रक्रिया हाती घेत आहोत. त्यानुसार खुलताबादचं रत्नपूर असं नाव असलं पाहिजे. कारण तेच नाव पूर्वी देखील होतं. औरंगाबादचं नाव बदललंय. तसंच आता खुलताबादचं बदललं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.”