3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून आज अर्थमंत्री अजित पवार ते विधीमंडळामध्ये सादर करणार आहेत.
राज्यामध्ये महायुतीचे सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष हे अर्थसंकल्पाकडे लागले आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे यंदा अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिलमाफी मिळणार का? लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळणार का? तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार का? आणि नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पाकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. मागील वर्षी निवडणूक समोर ठेवून महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. 1500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळत आहे. पण निवडणुकीच्या काळात हा हप्ता 2100 रुपये करणार अशी घोषणा केली होती. पण अजूनही वाढीव हप्ता सुरू झालेला नाही. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वाढवून दिला जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर राज्यामध्ये सर्वांचा पोशिंदा असलेल्या बळीराजासाठी कोणत्या घोषणा होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. उद्योगक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, रोजगार निर्मिती यासाठी देखील राज्य सरकार कोणते निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
यंदा अजित पवार हे 11 व्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. सर्वांत जास्त सादर करणाऱ्यांमध्ये अजित पवार हे सध्या तरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वांत जास्त अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा माजी अर्थमंत्री दिवंगत बॅ. शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.