मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा तयारीत आहेत. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच २९ ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.”आपल्याला रणभूमीत उतरायचं आहे आणि विजयही निश्चित मिळवायचा आहे. रणभूमीची तयारी अशी असली पाहिजे की, यावेळी यश आपलंच असणार,” असे ठाम शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. मैदान आपणच गाजवायचं असून, विजयाचा गुलालही आपल्या अंगावरच उधळला गेला पाहिजे.” मागील दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू असून, आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. “ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here