भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मी मंत्री झालो, पण हे शरद पवारांना अजूनही मान्य होत नाही, असं म्हणत राजकारण संपलं तरी चालेल, पण मी पवारांच्या पुढे कधीही झुकणार नाही’, असं एका कार्यक्रमात म्हटलं आहे.
“ज्या लोकांवर माझ्या माण खटावच्या मातीने, जिल्ह्याने प्रचंड प्रेम केलं अशा बारामतीच्या लोकांना सर्वात आधी कळ लागली की हा सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. हा साधा माणूस आमदार कसा होऊ शकतो. मी आमदार झालो हे त्यांनी १० वर्ष मान्य केलं नाही. आता आमदार झालो हे मान्य झालं, पण मंत्री झालो हे मान्य होत नाही. आजपर्यंत सर्व नेत्यांनी त्यांच्याबरोबर तडजोड केली असेल, पण या पश्चिम महाराष्ट्रातील मी एकमेव व्यक्ती आहे कधीही पवारांच्या पुढे झुकलो नाही आणि कधी झुकणारही नाही, माझं राजकारण संपलं तरी चालेल”, असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं.