मुंबई उपनगरातून मुंबईत नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. दररोज लाखो प्रवासी कामानिमित्त मुंबईत येतात. रस्ते मार्गे मुंबईत येण्यासाठी थेट कोणताही रस्ता नाही. यामुळे या शहरातून जलद गतीने मुंबईत येण्यासाठी लोकल ट्रेन हाच एकमेव पर्याय आहे. मात्र मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये एक महामार्ग उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने जबरदस्त प्लान बनवला आहे. बदलापुर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांना डायरेक्ट मुंबई, नवी मुंबईशी जोडणारा महामार्ग बांधला जाणार आहे.
डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या उपनगरांमध्ये झपाट्याने नागरी वसाहती निर्माण होत आहेत. त्यामुळे या शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा नवा महामार्ग येथील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. एमएमआरडीएने मर्यादित प्रवेश महामार्गाच्या बांधकामासाठी नुकतीच निविदा काढली. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या महामार्गामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई एयरपोर्ट इन्फ्युएन्स नोटिफाइड एरिया अर्थात NAINA याची कनेक्टिव्हिटी सोपी होईल. हा मार्ग नवी मुंबई आणि मुंबई उपनगरातील अंतर कमी करण्यास मदत करेल. त्याशिवाय यामुळे ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.
महामार्गावरील इंटरचेंज
बदलापूरपासून मुंबई-दिल्ली दरम्यान हा महामार्ग सुरू होणार आहे. यामध्ये मुंबई-वडोदरा मार्ग, काटई-बदलापूर आणि कल्याण रिंगरोडचा समावेश आहे. या महामार्गाचा पहिला इंटरचेंज अंबरनाथमधील पालेगावात असणार आहे. तर, दुसरा इंटरचेंज कल्याण पूर्वेतील हेदुटणेमध्ये असेल. यासह बदलापूर इंटरचेंज आणि कल्याण रिंगरोड इंटरचेंज असे एकूण चार इंटरचेंज असतील.