मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात ६ जुलैला मोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी ते सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश असणार आहे. राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे याचा प्रत्यय तुम्हाला ६ तारखेला येईल असं सूचक विधानही राज ठाकरेंनी केलं आहे.
“मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मराठी माणसाचा मोर्चा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिकाशी बोलणार आहोत. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सरकाराला कळू दे. महाराष्ट्राने आपली संपूर्ण ताकद दाखवावी. सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरुन हा मोर्चा निघेल, विद्यार्थी, आणि पालकांना येता येईल यासाठी रविवार निवडला आहे. सर्व राजकीय पक्षांशी मी बोलणार आहे. प्रत्येकाने यात सहभागी व्हावं. महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा जो कट आहे त्याविरोधात सर्व मराठी लोकांनी मोर्चात सहभागी व्हावं अशी विनंती आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.