पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत, लोकलसेवा ठप्प

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. तर, रेल्वेसेवा देखील विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानकांत रेल्वे रूळांवर पाणी आले आहे. त्यामुळं कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने आहे. ठाणे रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. कुर्ला, सायन, दादर, परेल येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्याचाच फटका रेल्वेला बसला आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्ला ते दादर रेल्वेसेवादेखील विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या परळच्या पुढे एकही ट्रेन जात नाहीये. मस्जिदबंदर येथे रूळांवर पाणी साचले आहे.

मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे यामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरती रेल्वे वाहतूक ठप्प आहे अनेक ठिकाणी सकाळच्या गाड्या एकाच जागेवर उभ्या आहेत. तर हार्बर मार्गावरच्या डाऊन आणि अप दोन्ही मार्गावर एका मागोमाग एक लोकल उभ्या आहेत. हार्बर मार्गावरील नऊ वाजून ४५ मिनिटांची बेलापूरला जाणारी लोकल ट्रेन अकरा वाजून ३५ मिनिटांनी रवाना झाली आहे. स्थानकाजवळ रूळावर पाणी भरल्याने लोकलची वाहतूक ठप्प झाली तर रस्ते मार्गानेही वाहतूक मंद गतीने सुरू असून वाहतूक कोंडी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here