सोमवारी दोन गटांत निर्माण झालेल्या तणावामुळे नागपूरमध्ये दंगल उसळली. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच, या दंगलीत तब्बल ३३ पोलीस जखमी झाले असून त्यात तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी असल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज याबाबत विधानसभेत केलेल्या निवेदनात सांगितली. यावेळी नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीमध्ये एक सुनियोजित पॅटर्न दिसून येत असल्याचं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
नागपूर दंगलीमध्ये तीन डीसीपी जखमी झाले असून त्यातील एकावर चक्क कुऱ्हाडीनं वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यावर फडणवीसांनी विधानसभेत निवेदन देताना इशारा दिला आहे. पोलिसांवर हल्ला करणारे जे कुणी असतील, त्यांना सोडणार नाही.
“या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत ३३ पोलीस जखमी झाले आहेत. त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातल्या एका उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण ५ नागरिक जखमी झाले आहेत. तिघांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णालयात आहेत. त्यापैकी एक आयसीयूत आहे”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
दरम्यान, नागपूरमधील प्रकार हा सुनियोजित पद्धतीने घडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. “सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचं समोर येतंय. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रंही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे. वाहनांची जाळपोळ झाली आहे. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.