नाशिककरांनो सावधान! तुम्ही बनावट पनीर तर खात नाही ना?239 किलो बनावट पनीर साठा जप्त!

गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दुध व दुग्धजन्यपदार्थ जसे की पनीर, खवा, मावा इ. खाद्य पदार्थाची प्रचंड मागणी असते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील बनावट पनीर बनवणाऱ्या पेढीवर धाड टाकत 47 हजार 800 रूपये किंमतीचा 239 किलो पनीरचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंबड, नाशिक येथील मे. साई एंटरप्रायजेस, प्लॉट नं. 308, साईग्राम कॉलनी अंबड, नाशिक या पेढीमध्ये बनावट पनीर विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन अन्न व औषध प्रशासन विभागाने पेढीची तपासणी करुन पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेला संशयित पनीरचा 239 किलो ग्रॅम इतका साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाने या साठ्यामधून पनीर या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन तो प्रयोगशाळेकडे तपासणी कामी पाठविण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेला संशयित पनीरचा साठा हा नाशवंत असल्याने व तो परत खाण्याच्या उपयोगात येवू नये याकरीता त्यावर निळ टाकण्यात येवून साठा अन्न व औषध प्रशासनाकडून महानगरपालिकेच्या घंटा गाडीत नष्ट करण्यात आला.


दरम्यान, चीज ॲनालॉग अर्थात बनावट पनीर संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या लक्षवेधीनंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात सर्रास वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाने आरोग्यास धोका निर्माण झाला असून विक्रमसिंह पाचपुतेंनी सभागृहात बनावट पनीर दाखवले होते. आता याबाबत कोणते महत्त्वाचे आदेश दिले जातात हे पाहणं महत्वाचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here