पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परतल्यानंतर दिलं भारत भेटीचं आमंत्रण

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहले आहे. मोदी यांनी या पत्रात सुनीता विल्यम्स यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना लिहिलेले पत्र एक्सवर शेअर केलं आहे. “भले ही आप हजारो मैल दूर है, लेकिन आप हमारे दिलो के बहुत करीब है”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात म्हटलं आहे.

मोदींनी पत्रात म्हटलं की, “मी तुम्हाला भारतीयांच्यावतीने शुभेच्छा देतो. आज मी प्रसिद्ध अंतराळवीर माईक मॅसिमो यांना एका कार्यक्रमात भेटलो. या संभाषणादरम्यान तुमचे नाव समोर आले आणि आम्ही तुमच्या कामाचा आम्हाला किती अभिमान आहे, यावर चर्चा केली. या चर्चेनंतर मी तुम्हाला पत्र लिहिण्यापासून स्वतः ला रोखू शकलो नाही. तसेच मी जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा माजी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना त्यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भेटलो, तेव्हा मी नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल विचारलं होतं. भारतीयांना तुमच्या कामगिरीचा नेहमीच अभिमान वाटतो”, असं मोदींनी म्हटलं आहे.

“तुमची प्रेरणादायी जिद्द आणि परिश्रम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मिशनच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर आम्ही तुमचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहोत. यजमानपद भूषवणं ही भारतासाठी अभिमानाची बाब असेल. तुम्हाला सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा”, असं नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here