चित्रपट, रंगमंच आणि वेब सिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने कायमच काहीतरी हटके सादर केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या पर्वातील सहभागाबाबत प्रियदर्शन म्हणाला, ”फु बाई फु’ सुरू होत असतानाच मी या टीमचा भाग होतो. पण काही कारणांमुळे तो प्रवास पुढे नेता आला नाही. आता ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वात सहभागी होत असल्याने असं वाटतंय की जणू पुन्हा घरी परतलो आहे.
माझ्या करिअरमध्ये झी मराठीचा मोठा वाटा आहे.’ प्रियदर्शन पुढे म्हणाला, ‘या शोमध्ये मी दिग्दर्शनाची काही जबाबदारी सांभाळणार आहे, काही स्कीट्स लिहिणार आणि अर्थातच अभिनयही करणार आहे. या पर्वासाठी प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच मोठ्या असणार आहेत. कारण गेल्या 10 वर्षांत या शोने महाराष्ट्रभर हास्याचा वर्षाव केला आहे. त्यामुळे आता काहीतरी नवीन देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.’