महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ वा वर्धापन दिन चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. याकरता त्यांनी महाकुंभ मेळ्यात गेलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समाचारही घेतला.
राज ठाकरे म्हणाले, “मुंबईला मेळावा बैठक लावली होती. काहीजण आजारी होते म्हणून आले नव्हते. त्यातील ५-६ जणांनी सांगितलं की कुंभला गेले होते. मी म्हटलं गधड्यांनो करता कशाला पापं? मी हेही विचारलं की आल्यावर अंघोळ केलीत ना…? हे बाळा नांदगांवकर छोट्याश्या कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. मी हड म्हटलं, मी नाही घेणार.”
ते पुढे म्हणाले, “पूर्वीच्या काळी ठीक होतं. पण आता मी सोशल मीडियावर पाहतोय, तिथे गेलेली माणसं, बाया त्या पाण्याने काखेत वगैरे घासतायत आणि बाळा नांदगावकर येऊन म्हणत आहेत की हे घ्या गंगेचं पाणी! कोण पिएल ते पाणी? आताच करोना गेलाय. दोन वर्षे तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत. मी कित्येक स्वीमिंग पूल पाहिलेत की उद्घाटनाच्या वेळी निळे होते, हळूहळू हिरवे होऊ लागले. कोण त्यात जाऊन पडेल?”, असा मजेशीर संवाद साधत त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.