राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र… ‘तूर्तास आंदोलन थांबवा’

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर म्हणजेच दादरच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मैदान अगदी खच्चून भरले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, ठाकरे शैलित तुफान भाषण केले. विविध मुद्यांवर तुफान फटकेबाजी करताना त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यालाही हात घातला. “महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच गेला पाहिजे. जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर त्याच्या कानफटीत मारा. शिवाय राज्यातल्या बँकांमध्येही मराठीत व्यवहार होत आहे की नाही हेही तपासा” असा आदेशच राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

राज साहेबांचा आदेश मिळाल्यावर कार्यकर्तेही ‘उत्साहात’ कामाला लागले. परंतु, आता राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास आंदोलन थांबवण्यासाठी एक पत्र लिहिलं आहे.

पत्रात काय आहे पाहुयात

सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.

पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ? आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे.

काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील ! “

आपला,
राज ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here