मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाळांमधील हिंदी सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी ५ जुलैला मोर्चा जाहीर केला आहे. राज ठाकरेंनी सर्वपक्षीयांना मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे. तसंच या मोर्चात कोण सहभागी होतं आणि कोण नाही हे पाहतो असा इशाराच दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं असून, कोणीही सांगतं आणि तुम्ही सहभागी व्हावं अशी भूमिका घेता येणार नाही असं विधान केलं आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी पुन्हा एकदा हिंदी सक्तीवर आपली भूमिका मांडली.
“यामध्ये दोन भाग आहेत. पहिली ते चौथीपर्यंत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. पाचवीपासून हिंदी विद्यार्थाच्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. देशातील 55 टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही, जी 55 टक्के लोक बोलतात. मराठी, मल्याळम, बंगाली, कानडी यांचा ठराविक लोकसंख्या आधार घेते. यामुळे म्हणून हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही,” असं स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं आहे.