भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल यासंदर्भातील प्रश्नांचं उत्तर आज सापडलं आहे. आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शुभमन गिलची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी ही घोषणा केली आहे. एकूण १८ जणांचा संघ निवडण्यात आला आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एका आठवड्याच्या कालावधीमध्ये कोसटीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधार कोण होणार याबद्दलची उत्सुकता कायम होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांची मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळेच या स्पर्धेसाठी कोणाची कर्णधार म्हणून निवड होणार याकडे भारताबरोबरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. आज अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवण्याचा निर्णय निवड समितीने घेतल्याचं सांगितलं.