शालेय शिक्षणामध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्यावरून राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सरकारविरुद्ध थेट मैदानात उतरत आहे. दोन्ही सेनांबरोबरच विरोधी पक्षांकडून ५ जुलै रोजी मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला जाणार आहे. मात्र हा मोर्चा काढण्याआधीच ठाकरे बंधू कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याची शक्यता आहे.
५ जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मनसे नेत्यांनी मोर्चाच्या नियोजनाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. तसेच या मोर्चासाठी परवानगी देण्यासाठी अर्जही मनसेकडून सादर करण्यात आला. मात्र अद्याप पोलीस अधिकाऱ्यांकडून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसे आणि शिवसेना वेगळे झाल्यानंतर तब्बल १८ वर्षांहून अधिक काळाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी निमित्त ठरणारा मोर्चा होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
मनसे आणि शिवसेनेनं हा मोर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या नियम व अटीच्या अधिन राहून काढावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी किंवा रस्त्यांवर मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अधिवेशनचा कालावधी असल्याने या मोर्चाच्या परवानगीबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.