मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाशी निगडित ९ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याशिवाय राज्यातील प्रशासकीय विभागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने ५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत.
या बदल्यांमध्ये हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनीता मेश्राम यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांची माहिती लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे (केडीएमसी) आयुक्तपद इंदुराणी जाखड सांभाळत होत्या. त्यांचीही बदली करण्यात आली आहे. आता अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची महापालिका असून मुंबईच्या जवळ असल्याने प्रशासकीयदृष्ट्या या पदाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नव्या आयुक्ताच्या निवडीबाबत औत्सुक्याचं वातावरण होतं. अखेर सात दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अभिनव गोयल यांची केडीएमसीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने महापालिकेच्या कारभाराला नवे नेतृत्व लाभले असून, प्रशासनाच्या गतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारकडून ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, विविध महत्त्वाच्या पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महसूल, माहिती तंत्रज्ञान आणि नागरी प्रशासनाशी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सी. के. डांगे : यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
संजय काटकर : यांची नियुक्ती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.
अनीता मेश्राम : यांची अकोला जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्या यापूर्वी महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होत्या.
अभिनव गोयल : हे हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
आयुषी सिंह : यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.