मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्येही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पुढल्या पिढीतील व्यक्तीही ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करु लागल्या आहेत. आदित्य ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही दोन्ही भावांनी बोललं पाहिजे असं म्हटलं आहे.
मंगळवारीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी त्यांचा पक्ष आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं आहे, अशी आठवण करुन देत संभाव्य युतीसाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. डोंबिवलीमधील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं, असं सांगतानाच आदित्य यांनी हा युतीचाच एक भाग असल्याचं सूचित केलेलं. महाराष्ट्र हितासाठी जर आमच्या सोबत कोणी येत असेल तर स्वागत आहे. मग ते कोणीही असू आम्ही त्यांना सोबत घेऊ, असं आदित्य ठाकरेंनी युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता म्हटलं होतं.
आता आदित्य ठाकरेनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांचे युती संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांशी फोनद्वारे संपर्क साधावा एकमेकांचे नंबर दोघांकडेही आहेत असंही अमित ठाकरे म्हणालेत.