राज्यात सध्या मनसे-शिवसेनेच्या युतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. यादरम्यान आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच असं सांगत त्यांनी एकाप्रकारे युतीला हिरवा सिग्नलच दिला आहे.
मातोश्रीवर चारकोपमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाही सुजाता शिंगाडे यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार यासंदर्भात विचारणा करण्यात आली. तसंच मनसेने तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं विचारलं असता ते म्हणाले, “जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल”. इतर बारकावे आम्ही पाहतो असं सांगत त्यांनी यापेक्षा जास्त भाष्य करण्यास नकार दिला.
“मी संदेश नाही, बातमीच देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहे. त्यांच्याही मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.