उद्धव यांच्या अटींमुळे राज यांच्यासोबत मनोमिलन फिस्कटलं?

आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड एक तास राजकीय चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी या भेटीनंतर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकरांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ठाकरे बंधुची युती होण्याआधीच फिस्कटते की काय अशी जोरदार चर्चा आहे. अशातच उदय सामंत यांनी दोन्ही ठाकरे बंधूंमधील युती ही उद्धव ठाकरेंनी राज यांना घातलेल्या काही अटींमुळे फिस्कटल्याचा दावा केला आहे.

राज आणि फडणवीस यांची भेट महायुतीमध्ये मनसे सहभागी होण्यासंदर्भात असेल तर आम्हाला आनंद असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका मांडताना उदय सामंतांनी म्हटलं आहे. “राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कुठे बैठका घ्यायच्या हा त्यांचा अधिकार आहे. आज वांद्र्याच्या हॉटेलमध्ये देवेंद्रजी आणि राज ठाकरेंची भेट होत असेल, त्यात काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितल्याशिवाय आपण बोलण्यात काही अर्थ नाही,” असही उदय सामंत म्हणाले.

उदय सामंतांनी पुढे बोलताना उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना काही अटी घालण्यात आल्याचा दावा केला आहे. “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतत राज ठाकरेंना आमंत्रण मिळत होतं. मात्र त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यातली पहिली अट काय तर एकनाथ शिंदेंबरोबर बोलायचं नाही, त्यांच्याकडे बघायचं नाही. देवेंद्र फडणवीसांशी बोलायचं नाही, अमित शाहांची बोलायचं नाही. दिल्लीशी संपर्क ठेवायचा नाही. जसं आपण शालेय जीवनात भांडणं झाल्यावर एकत्रित येण्यासाठी तशा अटी-शर्ती घालतो तश्या पहिल्या प्रस्तावात ठेवण्यात आलेल्या हे आम्ही तुमच्याकडून ऐकलं आहे आणि बघितलं आहे. त्यावेळीही मी सांगितलं होतं, वैयक्तिक मत मांडताना म्हटलेलं की राज ठाकरे हे स्वतंत्र्य व्यक्तीमत्व असलेलं नेतृत्व आहे. अशा अटींसमोर ते झुकणार नाहीत. ते आज त्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. ते देवेंद्रजींना भेटले असतील तर यांच्या अटींना त्यांनी जुमानलं नाही हे सिद्ध झालं,” असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here